करोना विषाणूचा सर्वाधिक धोका हा मध्यम वयोगटानंतर २१ ते ३० वयोगटाला असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या २०३ रुग्णांपैकी या वयोगटातील ४४ तरुणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर ३१ ते ४० या वयोगटामधील ४३ तर ४१ ते ५० वयोगटातील ३८ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालामध्ये ही माहिती स्पष्ट झाली आहे. सोमवारपर्यंत राज्यात नोंदवण्यात आलेल्या या करोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये असून मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे ८७ रुग्णांची नोंद झाली आहे, त्या खालोखाल पुणे आणि सांगलीमध्ये २५ तर नागपूरमध्ये १४ करोनाबाधित आढळून आले आहेत. वसई आणि ठाण्यात प्रत्येकी पाच तर कल्याणमध्ये सहा रुग्ण आढळून आले आहेत. नवी मुंबई, यवतमाळमध्ये प्रत्येकी चार तर अहमदनगरमध्ये तीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात नोंदवलेल्या आकडेवारीमध्ये ६४ टक्के पुरुष तर ३६ टक्के स्त्रियांना करोनाचा संसर्ग झाला आहे